लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा; मोजक्या कर्मचाऱ्यांवर वाढता कामाचा ताण
लोणी काळभोर, (ता. हवेली) : शहरात गुन्हेगारी वाढली की सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांवर टीका केली जाते. मात्र, पोलिस कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत काम करत आहेत, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अलीकडेच ३० ते ३५ हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. आधीच मर्यादित मनुष्यबळ असताना झालेल्या या मोठ्या बदल्यांमुळे पोलीस यंत्रणेवर ताण वाढला असून, कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर अनेक पटींनी जबाबदारी पडत आहे.
नव्याने केवळ काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आभास निर्माण केला जात असला, तरी प्रत्यक्षात पोलीस ठाणे मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेशी झुंज देत आहे. “सर्व काही सुरळीत आहे” असा दावा केला जात असला, तरी वास्तव वेगळे चित्र दाखवत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होत असल्याचे दिसते.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, वाहनचोरी, पाकीटमारी, मारहाण, खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे तसेच महिलांवरील अत्याचार आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढताना दिसत आहेत. याशिवाय ऑनलाइन व ऑफलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्किंगच्या अपुऱ्या सुविधांमुळे वाहनचोरीचे प्रकार अधिक वाढले आहेत.
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हद्दीत तीन पोलीस चौक्या कार्यरत आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या चौक्यांचे कामकाजही प्रभावीपणे चालत नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक ठिकाणी पुरेसे कर्मचारी नसल्याने गुन्हेगारीवर वचक ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी भीती कमी होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असले, तरी अपुऱ्या साधनसामग्री व मनुष्यबळामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दिवस-रात्र सेवा देऊनही अपेक्षित परिणाम साधण्यात अडचणी येत असल्याने पोलिसांची दमछाक होत आहे.
दरम्यान, नागरिकांपुढे महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याला आवश्यक मनुष्यबळ कधी मिळणार? वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार? प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. “स्मार्ट सिटी”च्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात सक्षम व सशक्त पोलीस यंत्रणा उभी करण्याची गरज आता अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.





















