उरुळी कांचन मध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
उरुळी कांचन (प्रतिनिधी) : उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्णव नानासाहेब देशमुख (वय 4) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 15 जून) सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास अर्णव हा दत्तवाडी येथील आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खिडकीतून थेट खाली सिमेंटच्या जमिनीवर कोसळला.
या भीषण अपघातात अर्णवच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील नानासाहेब देशमुख यांनी तातडीने त्याला उपचारासाठी उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार अर्णवला रात्री साडेआठच्या सुमारास विश्वराज हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी (दि. 16 जून) दुपारी सुमारे 12 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने लोणी काळभोर पोलिसांना दिली होती. त्यानंतर महिला पोलीस हवालदार पूनम चांदगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र गोसावी करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.





















