मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या समितीत हवेली तालुक्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची निवड
लोणीकाळभोर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या गठन प्रक्रियेला वेग आला असून हवेली तालुक्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. लोणीकाळभोर तहसील कार्यालयाने या शेतकऱ्यांच्या नावांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, हवेली यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांचा समितीत समावेश निश्चित करण्यात आला.
तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणीकाळभोर येथून १७ जून २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र शासनाच्या २४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये महसूल विभागामार्फत “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण, सुधारणा आणि विकासकामांना गती देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला असून स्थानिक गरजा व अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे.
समितीसाठी निवड झालेले प्रगतशील शेतकरी पुढीलप्रमाणे :
• लोचन विजय शिवले (लोणीकंद)
• मिलिंद यशवंत हरगुडे (केसनंद-कोरेगाव)
• अण्णासाहेब भाऊसाहेब महाडिक (उरुळीकांचन-सोरतापवाडी)
• दिलीप नारायण वाल्हेकर (थेऊर-आव्हाळवाडी)
• अण्णासाहेब गणपत काळभोर (लोणी काळभोर-कदमवाकवस्ती)
तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे या पाचही प्रगतशील शेतकऱ्यांचा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत समावेश करण्याची शिफारस केली होती.
या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या, पाणंद रस्त्यांची गरज, विकासकामांचे प्राधान्यक्रम आणि स्थानिक पातळीवरील समन्वय अधिक प्रभावीपणे साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या शेतरस्त्यांच्या विकासाला या योजनेमुळे मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





















