लोणी काळभोरमध्ये टँकर वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट; उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू, परिसरात हळहळ
लोणी काळभोर, ता. ५ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात मंगळवारी (दि.५) सकाळी घडलेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने अखेर दुर्दैवी वळण घेतले आहे. टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू असताना झालेल्या प्रचंड स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान आज सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून औद्योगिक सुरक्षेच्या नियमांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळी मळा परिसरातील ‘भारत वेल्डिंग वर्क्स’ या वर्कशॉपमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास एका टँकरची दुरुस्ती सुरू होती. टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की परिसर अक्षरशः हादरून गेला. शेडचे पत्रे हवेत उडाले तर आजूबाजूच्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या दुर्घटनेत चांद बाबू पटेल (वय २२) हा कामगार गंभीररीत्या भाजला गेला होता. स्फोटानंतर तो काही वेळ शेडखाली अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी प्रसंगावधान राखत जखमी कामगाराला बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे प्रथम सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित टँकर हा पेट्रोल-डिझेल वाहतुकीसाठी वापरला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंमुळे वेल्डिंगच्या ठिणगीने हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या टँकरवर वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने टाकीत पाणी भरणे किंवा गॅस पूर्णपणे बाहेर काढणे आवश्यक असते. मात्र सुरक्षेचे नियम पाळण्यात निष्काळजीपणा झाल्यानेच हा भीषण अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. संबंधित वर्कशॉपमध्ये सुरक्षाविषयक उपाययोजना पुरेशा होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निष्काळजीपणा मुळे झालेल्या अपघातात संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होताना दिसत आहे.
दरम्यान, तरुण कामगाराच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.





















