‘नायगाव गोळीबार प्रकरण’ फरार आरोपींना नाशिकमधून बेड्या..!
Maharashtra Express News
उरुळी कांचन,(ता.हवेली) : नायगाव (ता. हवेली) येथील कबीर चायनीज हॉटेलमध्ये गावठी पिस्तूलने गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन मुख्य फरार आरोपींना जेरबंद करण्यात उरुळी कांचन व स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
सिद्धार्थ गोविंद कांबळे (वय –२८, रा. कोरेगाव मूळ) आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे (वय- २० रा. उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून दोन गावठी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी मिलिंद बापू शेलार (वय ३८, रा. नायगाव) हे कबीर चायनीज हॉटेलमध्ये असताना एका दुचाकीवरून तीन अनोळखी इसम तेथे आले. त्यातील एकाने पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने फिर्यादीवर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. ज्याबाबत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक(SP) संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यापूर्वीच नवनाथ आनंदा घुले (वय २८, रा. दहीटणे) याला अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते.
तपासादरम्यान मुख्य सूत्रधार सिद्धार्थ गोविंद कांबळे आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे हे नाशिक परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता फिर्यादी आणि आरोपी सिद्धार्थ कांबळे यांच्यात जुना जमिनीचा वाद होता. याच वादातून सिद्धार्थने इतर आरोपींच्या मदतीने हा कट रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक आरोपी यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक सखोल तपास करण्यात येत आहे.
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक मीरा मटाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश नागरगोजे, राजु मोमिन, भारत मोहोळ, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन जगताप, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, अजित काळे, सुमित वाघ, सोमनाथ सुपेकर यांचे पथकाने केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.





















