लोणी काळभोर-उरुळी कांचन परिसरात वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा ; पोलीस फक्त दंड वसुलीत दंग..!
महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज : हनुमंत सुरवसे
लोणी काळभोर : लोणी काळभोर,(Loni Kalbhor)दि.१७ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान सध्या ‘वाहतूक कोंडी’ मुळे नागरिक त्रस्त झाले असून, याला कारणीभूत ठरत आहेत ते महामार्गालगत असलेल्या शेकडो मंगल कार्यालयांचा मनमानी बेजबाबदार कारभार..!
मात्र या वाहतुकीच्या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत लोणी काळभोर व उरुळी कांचन वाहतूक पोलीस ‘मार्च एंड’ (March End) च्या नावाखाली दंडाची मोहीम राबवण्यात व्यस्त असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.
पुणे सोलापूर महामार्गांवरील शेवाळवाडी येथील स्वजय पॅलेस, आकाश लॉन्स, कदमवाकवस्ती येथील गुलमोहर, मधुबन, काळभोर लॉन्स तसेच कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स अशी अनेक मंगल कार्यालये महामार्गालगत आहेत. त्यामुळे येथे कार्यक्रम सुरू झाला की पाहुण्यांच्या गाड्या थेट मुख्य महामार्गांवर किंव्हा सर्व्हिस रोडवर उभी केली केली जातात. कोणतेही नियोजन नाही, पार्किंगची सोय नाही आणि वाहतूक नियंत्रणाचा पूर्ण अभाव असल्याने संपूर्ण महामार्ग ठप्प होतो. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी,महिला, अशा रोजच्या प्रवाशांना बसत असून, तासनतास वाहतूक कोंडीत अडकून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

कदमवाकवस्ती परिसरातील एका मंगल कार्यालयात सोमवारी (दि. १६) रोजी झालेल्या विवाह सोहळ्यामुळे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. रस्त्यावर बिनधास्त गाड्या पार्क केल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तब्बल ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक तासाहून अधिक काळ नागरिक अडकून पडले होते.
विशेष बाब म्हणजे या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका (Ambulance +)अडकली होती. जीवन-मरणाच्या प्रसंगी धावणाऱ्या रुग्णवाहिकांनाही रस्ता मिळत नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या प्रकरणात ना मंगल कार्यालय व्यवस्थापनाने जबाबदारी घेतली, ना पोलिस प्रशासन प्रभावी कारवाई करताना दिसले.
त्याच प्रमाणे उरुळी कांचन येथील तळवडी चौकात दररोज संध्याकाळी ७ ते १० या वेळेत वाहतूक कोंडी होते. मात्र ती सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र दिसते. शनिवार, रविवार तर वाहनांची लांबच लांब रांग असते. एखाद्या मोठ्या नेत्याचा ताफा जाणार असेल तेव्हाच पोलीस तत्परतेने रस्त्यावर उतरतात. अन्यथा नागरिकांना स्वतःच मार्ग काढावा लागतो, हीच सध्याची वस्तुस्थिती आहे.
एकीकडे मंगल कार्यालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असताना त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. दुसरीकडे सामान्य नागरिकांना मात्र किरकोळ कारणांवरून दंड केला जातो. या दुहेरी धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. लोणी काळभोर व उरुळी कांचन वाहतूक पोलीस महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात अपयशी ठरत आहेत का, की या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.





















