पुणे : पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथील विषारी गावठी दारू प्रकरणाची धग अद्याप शांत झालेली नसतानाच हडपसर परिसरात आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. गावठी विषारी दारू प्राशन केल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा ते बारा जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले असून अवैध दारू व्यवसायाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी आकाश दीपक जाधव (वय ३०, रा. पांढरेमळा, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह इतर काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात विषारी रसायने मिसळून गावठी दारू तयार करून तिची विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
मृतांमध्ये राहुल शरद क्षीरसागर, विजय भूकुरलाल शर्मा, अरुण वामन डाडर, दत्ता माधवराव सूर्यवंशी, अशोक रमेश चव्हाण आणि प्रवीण जाधव यांचा समावेश आहे. दारू सेवन केल्यानंतर मळमळ, उलट्या, डोळ्यांवर अंधारी येणे, तोंडाला फेस येणे अशी गंभीर लक्षणे दिसून आली. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, ही विषारी दारू शहरातील विविध भागात पोहोचल्याची भीती व्यक्त होत असून बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हडपसरमधील पांढरेमळा व मंत्री मार्केट परिसरातील गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्थानिक यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे सहा बळी ?
शहरात खुलेआम सुरू असलेल्या हातभट्टी व गावठी दारू व्यवसायाकडे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हडपसर, काळेपडळ, पिसोळी आणि परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दोषींना सोडणार नाही – पोलिस आयुक्त अमितेश कुमार
या प्रकरणात खून आणि दारूबंदी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
यासोबतच शहरातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आजपासून ‘ऑपरेशन वॉश आउट’ मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मृतांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सहा निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या विषारी दारूच्या या काळ्या साम्राज्याचा बीमोड कधी होणार, हा प्रश्न आता संपूर्ण पुणेकर विचारत आहेत.





















