आळंदीत चर्मकार समाजाची महाबैठक; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला एकमुखी तीव्र विरोध, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
आळंदी (पुणे), प्रतिनिधी : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात चर्मकार समाजाने आळंदी येथे एकजुटीचे शक्तिप्रदर्शन करत तीव्र भूमिका घेतली. गुरुवार (दि. २८ मे) रोजी हराळे वैष्णवी समाज धर्मशाळा, आळंदी येथे राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक व समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या महाबैठकीत उपवर्गीकरणाला एकमुखाने विरोध दर्शविण्यात आला.
बैठकीस माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी वाघमारे महाराज, राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने, ग्राहक कल्याण व चर्मकार ऐक्य महापरिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत आप्पा गवळी, वैष्णवी हराळ समाज धर्मशाळेचे अध्यक्ष बाबा कांबळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई विभागाध्यक्ष विलास गोरेगावकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चिंतन करण्यात आले. उपवर्गीकरणाला संपूर्ण ताकदीने विरोध करण्यासाठी आणि पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील प्रत्येक चर्मकार समाज बांधवाला या न्याय हक्काच्या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात चर्मकार समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करून उपवर्गीकरणासह इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जातींची एकजूट अबाधित ठेवण्यासाठी चर्मकार समाजाने आंबेडकरी जनसमुदायासह अनुसूचित जातीतील सर्व घटकांसोबत राहण्याचा ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आला.
यावेळी शासनाने अनुसूचित जातींचा प्रलंबित बॅकलॉग भरावा, पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी करण्यात आली. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्रालयावर राज्यस्तरीय धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली असून, राज्यभरातून लाखो समाजबांधव सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
याशिवाय आगामी जातीय सर्वेक्षणाबाबत समाजाला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्मकार समाजातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण होणे आवश्यक असून, कोणतेही कुटुंब वंचित राहू नये यासाठी समाजबांधवांनी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीतील मान्यवरांचे स्वागत वैष्णवी हराळ समाज धर्मशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले, तर तुषार नेटके आणि अनिल सातपुते यांनी आभार मानले.





















